शिकारीच ठरले शिकार! मध्यरात्री नांदेड हादरलं

नांदेड शहरातील कॅनाल रोड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं शुक्रवारी मध्यरात्री रक्तरंजित राडा झाला आहे. गँगवॉरमधून तीन जणांची हत्या करण्यात आली आहे.

दोन मयत हल्लेखोर एकाची हत्या करण्यासाठी कॅनाल परिसरात आले होते. मात्र हा डाव त्यांच्यावरच उलटला असून दोन्ही हल्लेखोरांसह ज्याच्यावर हल्ला झाला तो, अशा तिघांचा भयंकर मृत्यू झाला आहे. तिहेरी हत्याकांडाची ही घटना उघडकीस येताच संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अर्जित सिंघ चव्हाण, मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेझ असं हल्ल्यात मृत पावलेल्या तिघांची नावं आहेत. मयत अर्जित सिंघ चव्हाण हा नांदेडमध्ये गुन्हेगारी टोळी चालवतो. सदा गँग नावाची त्याची टोळी आहे. तर मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेझ दोघही नांदेडमधील साई लाला गँगचे शूटर आहेत. या दोन गँगमध्ये झालेल्या गँगवॉरमधून तिघांची हत्या झाली आहे. तर इतर पाच जण जखमी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडमधील सदा गँग आणि साई लाला गँगमध्ये मागील अनेक महिन्यांपासून वाद सुरू होता. दोन्ही गँग वर्चस्ववादातून एकमेकांना खुन्नस देत होत्या. शुक्रवारी रात्री अर्जित आपल्या मित्रासह डी मार्ट येथून बुलेटवरुन जात होता. याचवेळी दबा धरलेल्या अरबाज आणि त्याच्या साथीदारांनी तलवारीने हल्ला केला. यात अर्जितचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्याच ठिकाणी अर्जित सोबत असलेल्या साथीदारांनी अरबाजवर चाकू आणि खंजीरने वार केले. यात अरबाजचा देखील मृत्यू झाला.

या घटनेनंतर अर्जित याच्या भावाने रूग्णालयात जाऊन साई लाला गँगच्या आवेझ याचा खून केला. या रक्तरंजित कांडात दोन्ही गँगचे मिळून तीन ठार झाले आहेत. तर पाच जण जखमी आहेत. आता पर्यंत सात ते आठ जणांना भाग्य नगर पोलिसानी ताब्यात घेतलं आहे. दोन्ही गँगमधील वादाच्या कारणाचा पोलीस तपास करत आहेत. मात्र एकाच रात्रीत अशाप्रकारे तीन जणांची हत्या झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.