
लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थींच्या खात्यावर जमा झाला आहे. त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेसाठीची ईकेवायसीतील दुरुस्ती करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत.

ही मुदत आज ३१ मार्च रोजी संपणार आहे.आतापर्यंतच्या E-KYC प्रक्रियेनंतर पडताळणीमध्ये ७१ लाख महिला अपात्र ठरल्या असून, त्यांची नावे लाभार्थी यादीतून कापली गेली आहेत.सुरुवातीला या योजनेचे २ कोटी ४७ लाख लाभार्थी होते, पण आता ही संख्या १ कोटी ७६ लाखांवर आली आहे. सुमारे ७१ लाख महिला या यादीतून बाहेर पडल्या आहेत. मंत्री आदिती तटकरे यांनी आज रात्रीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीआधी सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांच्या बँक खात्यावर दरमहिना १५०० रुपये निधी जमा करण्यात आला.मात्र या योजनेत मोठ्या प्रमाणावर बोगस लाभार्थी घुसल्याचे सरकारच्या निदर्शनास आणले. केवळ अडीच लाखांचे उत्पन्न असणाऱ्यांसाठी असलेल्या या याजनेत सधन महिला तसेच सरकारी कर्मचारी महिलांनीही लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना अंकुश लावल्यानंतर ईकेवायसीच्या माध्यमातून अन्य बोगस लाभार्थ्यांना या योजनेतून बाद करण्याची योजना आखण्यात आली.
त्यानुसार ईकेवायसीसाठी ३१ डिसेंबरची अंतिम मुदत देण्यात आली. मात्र अनेक महिलांनी कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत आहे किंवा नाही यासाठी देण्यात आलेल्या पर्यायांतून चुकीचा पर्याय निवडला. त्यामुळे त्यांचा १५०० रुपयांचा हप्ता बंद झाला. अशा महिलांच्या तक्रारीनंतर दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा ३१ मार्चची मुदत देण्यात आली.










