
नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरात प्रकरण राज्यभरात गाजत आहे. भविष्य बघण्याच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या या बाबाचे नवनवे प्रताप समोर येत आहेत. अशोक खरातचे राजकारण्यांशी संबंध होते म्हणूनच त्याचे काळेधंदे सुरु होते असाही आरोप होत आहे. याचबाबत आता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

अशोक खरात प्रकरणात भाजप मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. अशोक खरातला एवढा मोठा राजकीय आश्रय होता की त्यांच्यावर कारवाईचे कोणी धाडसही करत नव्हते, असा गंभीर दावा विखे पाटील यांनी केला आहे. नाशिक पोलीसांच्या नाकाखाली कारभार सुरू होता, आधीही तक्रारी होत्या, मग कारवाई का झाली नाही ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

” अशोक खरातांचे पुरस्कर्ते एवढे होते, त्यांना एवढा मोठा राजकीय आश्रय मिळाला होता. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाईचे धाडस होत नव्हते. कायदा, सुव्यवस्था बघणाऱ्या यंत्रणांची देखील काही जबाबदारी आहे, शिर्डीत मी गुन्हा दाखल केला नसता तर किती वर्षे हे असेच चालले असते. SID, गुप्तचर यंत्रणा, स्थानिक गुन्हे शाखा काय करत होती? राजकीय पुढारी आणि ईतर अधिकाऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा मूळ जबाबदारी कोणाची होती ? याकडे लक्ष दिले पाहिजे, अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनावरही संताप व्यक्त केला आहे.









