
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सर्व यंत्रणांना निर्देश, पुणे मेट्रो लाईन ३ चे काम गतीने पूर्ण करण्याचे आदेश

पुणे – हिंजवडी, राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला अधिक चालना देण्याकरिता परिसरातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, या भागात पावसामुळे साचणारे पाणी, स्वच्छतेचा प्रश्न व वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी तात्काळ नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित यंत्रणाना दिल्या.

हिंजवडी आयटी पार्क परिसरातील समस्या व पुणे मेट्रो लाईन तीन च्या कामाची पाहणी श्री पवार यांनी आज केली पाहणी केल्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पवार म्हणाले, या परिसरातील परिसरातील कचऱ्याची समस्या तात्काळ दूर करून ज्या भागात कचरा साचला आहे तो तात्काळ उचलण्यात यावा, आयटी पार्कच्या परिसरात असलेले ओढ्यांचे, नाल्यांचे नैसर्गिक स्त्रोत बुजवून तेथे अतिक्रमण करण्यात आले आहे ते अतिक्रमण तात्काळ संबंधित यंत्रणांनी काढून ओढे स्वच्छ करून त्याचे नैसर्गिक स्त्रोत मोकळे करावे, या भागातील वाढती वाहतूक समस्या लक्षात घेता नव्याने सहा पदरी रस्ता तयार करण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएने बांधकाम आराखडा तयार करावा. या कामासाठी महसूल प्रशासन एमआयडीसी, जिल्हा परिषद आदी संबंधित विभागांनी व स्थानिक लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. माण ग्रामपंचायत हद्दीत माण देवीच्या मंदिरालगत असलेल्या ओढ्यावरील बांधकामाचे अतिक्रमण जिल्हा परिषदेने तात्काळ हटवावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मेट्रो कार शेड जवळ असलेल्या लक्ष्मी चौकातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात. लक्ष्मी चौकात पिंपरी येथील भक्ती शक्ती स्थळासारखे स्थळ उभाराच्या दृष्टीने नियोजन करावे, रिंग रोड वनजमिनीच्या प्रस्तावाबाबत सर्वोच्च प्राधान्याने काम करावे. तसेच कॅपजेमिनीजवळ पर्यायी रस्ता बनवावा. हिंजवडी भागात कितीही पाऊस झाला तरी येथे पाणी साचता कामा नये असे काम झाले पाहिजे. त्या दृष्टीने कामाचे नियोजन करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
पवार यांनी बैठकीपूर्वी हिंजवडी आयटी पार्क परिसरातील पद्मभूषण चौकातील पुणे मेट्रो लाईन 3 स्थानक – क्रोमा, हिंजवडी, डॉलर कंपनी, कोहिनूर मदर सन आदी भागातील मेट्रोच्या कामाची पाहणी करून मेट्रो लाईनचे प्रलंबित कामे गतीने पूर्ण करावीत, अशा सूचना मेट्रो व टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांना करुन मेट्रो लाईनचे काम गुणवत्तापूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले.









