गुंड सुधीर गवस खूनाचा बदला घेण्यासाठी चौघा गुंडांनी केली वाहनांची तोडफोड

(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – पूर्ववैमनस्यातून नुकताच सुधीर गवस याचा खून करण्यात आला होता. आपल्या भाईच्या खूनाचा बदला घेणार असे म्हणत चौघा गुंडांनी रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकी व तीनचाकी रिक्षाची कोयत्याने तोडफोड करुन नुकसान केले. हत्यारे हवेत फिरवून दहशत माजविली. तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार येरवड्यातील जयप्रकाशनगरमधील माऊली चौक ते महिंद्रा सोसायटी दरम्यान सोमवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडली.

येरवड्यात पूर्ववैमनस्यातून सुधीर चंद्रकांत ऊर्फ बाळू गवस याचा तिघांनी १७ जुलै रोजी पहाटे अडीच वाजता खून केला होता. सुधीर गवस याचे आचार्य कुटुंबासोबत पूर्वीचे वाद होते. गवस याच्यावर मारहाणीसह विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे देखील दाखल होते. काही दिवसांपूवीृच तो तुरुंगातून सुटला होता. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा भांडणे झाली होती. त्यानंतर आचार्य कुटुंबीयांनी हत्यारासह त्याचा पाठलाग केला व पहाटेच्या सुमारास त्याला शोधून त्यावर वार करुन खून केला होता. यामुळे त्याचे साथीदार बदला घेण्याच्या पवित्रात आले आहेत.

या घटनेत प्रविण भगवान कांबळे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे माऊली चौक ते महिंद्रा सोसायटी दरम्यान शतपावली करत होते. यावेळी चौघे गुंड सुधीर गवस याच्या खूनाचा बदला घेण्यासाठी हातामध्ये कोयता व इतर हत्यारे घेऊन आले. त्यांनी रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकी व तीनचाकी अ‍ॅटो रिक्षाची तोडफोड करुन नुकसान केले. आमचा भाई गेला, आता जो कोणी मध्ये येईल त्याला आम्ही संपवून टाकणार, असे जोरजोरात ओरडून व हातातील हत्यारे हवेत फिरवून दहशत माजविली. फिर्यादी यांना जीवे मारण्यासाठी वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. पोलीस चौघांचा शोध घेत असून सहायक पोलीस निरीक्षक सोळुंके तपास करीत आहेत.