मतदारसंघात रुपयाचा निधी न आणलेल्यांना दूर करण्याची ही संधी, शिवाजीराव आढळराव पाटील यांची कोल्हेंवर टीका

लोणी काळभोर प्रतिनिधी – चंद्रकांत दुंडे | ज्यांनी पाच वर्षात रुपयाचा निधी आणला नाही, ज्यांच्या बोलण्यात वास्तविकता नाही,अशा व्यक्तीला दूर करायची हीच संधी लोकसभेच्या निवडणूकीच्या निमित्ताने मतदार म्हणून तुम्हाला आहे.अशी टीका महायुतीचे शिरुर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी डॉ.कोल्हे यांच्यावर केली. कुंजीरवाडी येथे गावभेट दौऱ्यातील सभेत ते बोलत होते. तुम्हाला स्टडीओच्या सेटवरचा खासदार पाहिजे का लोकांमध्ये असणारा पाहिजे हे ठरवण्याची देखील हीच वेळ आहे. असेही ते म्हणाले. आढळराव पुढे म्हणाले की,देशाचे भवितव्य ठरविणारी ही महत्वाची निवडणूक आहे.या मतदारसंघातील केंद्राच्या निधीवर उभे राहणारे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मोदींना पाठबळ द्यावे लागेल, त्यासाठी खासदार म्हणून पुन्हा एकदा मला पाठबळ द्या.

यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, हवेली तालुका अध्यक्ष दिलीप  वाल्हेकर, पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद, बाजार समिती सभापती दिलीप कालवलकर, हवेली बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन, हवेली शिवसेना तालुका प्रमुख विपुल शितोळे, विजेएनटी सेलचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप गाडेकर आदी यावेळी उपस्थित होते. या दौऱ्या दरम्यान आढळराव पाटील यांनी दादासाहेब तुपे, सचिन तुपे, सुमित तुपे यांच्या निवासस्थानी भेट दिल्या

गेल्या १५ वर्षात तुमच्या भागात आतापर्यंत कितीतरी वेळा या भागात मी आलो आहे.अनेक कामांसाठी खासदार निधी दिला आहे.त्यात रस्ते असतील अन्य प्रकल्प असतील त्यासाठी कायम तुमच्यासाठी कार्यरत राहीलो आहे.आता तर मतदारसंघातील मोठे प्रकल्प मार्गी लावायचे आहेत.त्यासाठी लोकसभेत जाण्यासाठी तुमचे पाठबळ हवे – शिवाजीराव आढळराव पाटील (महायुतीचे उमेदवार शिरुर लोकसभा मतदारसंघ)

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलेल्या टीकेला खासदार अमोल कोल्हे काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.