दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा मशाल आंदोलनाचा इशारा

एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक, परिवहन मंत्र्यांची कामगारांना साद, पीपीपी मॉडेलची चाचपणी

मुंबई – महागाई भत्ता आणि वेतनवाढीतील फरक रक्कम, दिवाळी भेट, सण उचल या मागण्यांचे फलक व क्रांतीची पेटती मशाल हातात घेऊन एसटी कर्मचाऱ्यांनी ‘मशाल मोर्चा’ची घोषणा केली. एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी प्रशासन आणि राज्य सरकारविरोधात आंंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कामगारांच्या विविध मागण्या आहेत. त्या रास्त असून या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कामगार संघटना सोबत मंत्रालयात आयोजित बैठकीत सांगितले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, कामगारांचे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व अन्य थकीत भत्ते, तसेच दिवाळी सण अग्रिम देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. २०१८ पासून कर्मचाऱ्यांची उपरोक्त स्वरुपाची आर्थिक देणी प्रलंबित आहेत. त्यासाठी सुमारे ४४०० कोटी रुपये लागणार आहेत. मंत्री सरनाईक म्हणाले, प्रत्येक वेळेस शासनाकडे निधी मागणी योग्य नाही, त्याकरता एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे आहे. कार्यभार स्वीकारल्यापासून एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जाहिरातीच्या माध्यमातून वर्षाला सुमारे १०० कोटी रुपये, आधुनिक पार्सल सेवेच्या माध्यमातून वर्षाला १०० कोटी तसेच महामंडळाच्या बस आगारात असलेले पेट्रोल पंप सध्या केवळ महामंडळाच्या बसेस करिता इंधन पुरवठा करतात. भविष्यात हे पेट्रोल पंप व्यावसायिक स्वरूपात सुरू करण्यात येत आहे. याद्वारे वर्षाला २०० ते २५० कोटी रुपये मिळतील. अशा प्रकारे वर्षाला ५००-६०० कोटी रुपयांची उत्पन्नात वाढ अपेक्षित आहे. याबरोबरच उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळाचे स्वतःचे प्रवासी ॲप विकसित करण्यात येत आहे, यामधूनही ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक सेवा पुरविण्यात येणार आहे.

पीपीपी तत्त्वावर एसटी महामंडळाच्या जागांचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये कामगारांना सदनिका व विश्रामगृह बांधण्याचे देखील प्रयोजन आहे. त्यातून कर्मचाऱ्यांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सार्वजनिक-खासगी भागिदारीतून होणाऱ्या प्रकल्प विकासातून महामंडळाची स्थावर मालमत्ता विकसित होईलच त्याचबरोबर वर्षाला एक ते दीड हजार कोटी रुपये उत्पन्न देखील मिळणे अपेक्षित आहे.