
भोसरी परिसरातील मोशी येथील औद्योगिक परिसरात बहिणीने आंतरधर्मीय प्रेम विवाह केल्यामुळे चिडलेल्या भावाने नातेवाईकांच्या मदतीने खून केला त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून मृतदेहाचे अवशेष नदीपात्रात फेकले. अमीर मोहम्मद शेख असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी पंकज विश्वनाथ पाईकराव, गणेश दिनेश गायकवाड, सुशांत गोपाळ गायकवाड, सुनील किसन चक्रनारायण यांच्या विरोधात आयपीसी ३६४, ३०२, २०१, १२० ब आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी पंकज पाईकराव, सुशांत गायकवाड आणि सुनील चक्रनारायण यांना अटक करण्यात आली आहे. तर गणेश दिनेश गायकवाड हा आरोपी अजूनही फरार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, रांधे येथील अमिर शेख आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुलीने चार महिन्यांपूर्वी आळंदी येथे आंतरधर्मीय विवाह केला. त्यानंतर ते मोशी येथे राहत होते. अमिर खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. बहिणीने आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून आरोपींनी १५ जून रोजी अमिरला दारु पिण्यासाठी बोलवून मोशीतील आदर्श नगर येथून त्याचे अपहरण केले. त्यानंतर आरोपींनी अमीर याचा गाळा आवळून खून केला आणि त्याचा मृतदेह आळंदी-चाकण रस्त्यावरील निर्जन ठिकाणी नेऊन जाळला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे अवशेष नदीपात्रात फेकले.
दरम्यान, अमिरच्या पत्नीने पती बेपत्ता झाल्याची तक्रार भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. अमिरच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यावर पोलिसांनी तपास करुन खुनाचा उलगडा करुन तीन आरोपींना अटक केली.अमीर आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुलीमध्ये प्रेमसंबंध होते. त्यांचे कुटुंब वीस वर्षापासून शेजारी राहत होते त्यांच्या संबंधात सलोखा होता. मात्र, दोघांनी प्रेमविवाह केल्यामुळे त्यांच्या संबंधामध्ये मोठी दरी निर्माण झाली.









