
वैवाहिक जीवनात पती-पत्नीत छोट्या मोठ्या कारणावरून वाद होत असतात. कधी कधी हे वाद टोकाला सुद्धा जात असतात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. किरकोळ कारणावरून पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढचा तपास सुरू आहे. मृत महिलेच्या भावाने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशातल्या गोंडा इथे एका व्यक्तीने वादातून थेट आपल्या पत्नीची गळा चिरून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. पती-पत्नीत स्वयंपाक बनवण्यावरून वाद झाला. त्यातून ही घटना घडली असल्याचे समोर येत आहे.या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

इटियाठोक पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या धर्मेई गावातआरोपी त्याच्या पत्नीसोबत शेतातल्या घरात राहत होता. स्वयंपाक बनवण्यावरून पत्नीशी त्याचा वाद झाला. त्या वेळी त्याने रागाच्या भरात चाकूनं वार करून पत्नीची हत्या केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयाच्या आधारे आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्रकरण उघडकीस आलं आहे. अपर पोलीस अधीक्षक मनोज कुमार रावत यांनी सांगितलं, की ‘स्वयंपाक बनवण्याच्या वादातून पतीनं पत्नीची हत्या केली. पतीला अटक करून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.









