सरपंच बापू आंधळे खून प्रकरणी ; आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी, बबन गीते अजूनही फरार

सरपंच बापू आंधळे मोठी अपडेट हाती आली आहे. आंधळे खून प्रकरणी केज परिसरातून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांना अटक करून आज परळी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या चारही जणांना ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्यातील मुख्य आरोपींना पळून जाण्यात या चार जणांनी मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे. आता याची चौकशी केली जाणार आहे. बापू आंधळे हे मरळवाडीचे सरपंच म्हणून निवडून आले होते. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कार्यरत होते. त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीये. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात झालेल्या गोळीबारात एकजण जागीच ठार झाला होता, तर दोघे गंभीररित्या जखमी झाले होते. परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा हा थरार घडला. दरम्यान, या गोळीबारामध्ये मरळ वाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय बनलय. नंदागौळ येथील ग्यानबा मारोती गित्ते आणि महादेव गीते हे दोघे गोळीबारात गंभीर जखमी झाले होते.

सरपंच बापू आंधळे खून प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता खून झालेल्या आणि खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तींना राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे हे प्रकरण संपूर्ण राज्यभर तापू लागलय. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि खून प्रकरणातील आरोपी बबन गीते अद्याप समोर आलेले नाहीत. ते अजूनही फरार आहेत.