
पहिल्या पत्नीपासून तलाक घेतल्याचे खोटे सांगून दुसरे लग्न केले. त्यानंतर हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केला. आजारी पडल्यानंतर भूत लागल्याचे सांगून एका मौलवीकडे नेऊन महिलेसोत अघोरी कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी चार जणांवर जादूटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत २६ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासु-सासरे आणि पहिल्या पत्नीवर भारतीय न्याय संहिता कलम ८६, ११५(२), ३५२,३५१(२, ३(५) सह जादुटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या घरच्यांना पतीचे पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला असल्याचे खोटे सांगितले. फिर्यादी व त्यांच्या घरच्यांना फसवून दुसरे लग्न केले. लग्नानंतर हुंड्यासाठी त्रास दिला. दरम्यान, आरोपी पतीची पहिली पत्नी नांदण्यासाठी पुन्हा सासरी आली. त्यामुळे त्यांच्यात वाद होऊन लागले. सासरच्या लोकांकडून आणि पतीकडून होत असलेल्या त्रासामुळे फिर्यादी आजारी पडल्या.
आजारी पडल्यानंतर आरोपींनी तुला भूत लागले आहे असे सांगून एका मौलानाकडे घेऊन गेले. त्याठिकाणी मौलाना याने लाल रंगाचे पातळ औषध फिर्यादी यांना पिण्यास दिले. त्यानंतर पतीने फिर्य़ादी यांना येरवडा येथे राहणाऱ्या काकाच्या घरी नेऊन सोडले. फिर्यादी या सासरी नांदण्यासाठी गेल्या असता सासरच्या लोकांनी फिर्य़ादी व त्यांच्या काकांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन घरातून हाकलुन दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.









