
पुणे : कोरोना काळानंतर बारामती लोकसभा मतदार संघातील दाैंडसह अनेक रेल्वेस्थानकावर थांबणाऱ्या काही रेल्वेगाड्यांचे थांबे बंद करण्यात आहेत. ते सर्व थांबे पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केंद्राकडे केली आहे.

खासदार सुळे यांचा याबाबत सातत्याने रेल्वेमंत्रालायकडे पाठपुरावा सुरू असून नुकत्याच संपलेल्या संसद अधिवेशनासह प्रत्येक अधिवेशनात त्या याबाबत आवाज उठवत आहेत. नुकत्याच झालेल्या अधिवेशनदरम्यान संसदेत झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान त्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केल्यावर सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लवकरच सर्व थांबे पूर्ववत सुरु करण्यात येतील, अशी ग्वाही दिली होती, त्यालाही आता एक महिना होत आला तरी अद्याप थांबे सुरू झाले नाहीत.

याची आठवण करून देत पुन्हा एकदा सुप्रियाताई सुळे यांनी ही मागणी केली असून तसे ट्विटही केले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील दाैंड, निरा, जेजुरी स्थानकांवरील अनेक रेल्वेगाड्यांचे थांबे कमी करण्यात आल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले आहे. रेल्वेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काही थांबे कमी केल्याचे रेल्वे मंत्रालयाने सांगितले होते. दौंड, बारामती, नीरा तसेच जेजुरी या भागातील खूप मोठे अर्थकारण रेल्वेवर अवलंबून आहे. हे लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने कार्यक्षमता वाढवण्यासाठी थांबे कमी करण्यापेक्षा इतर उपाययोजना कराव्यात अशी मागणी सुळे यांनी त्यावेळी केली होती. त्याचीही त्यांनी पुन्हा आपल्या ट्विटमधून आठवण करून दिली आहे.
https://x.com/supriya_sule/status/1876166535770669483?t=JS4c2Ks0iTEvlA-yuNwPHg&s=08









