
राजकारण संपल्यानंतर मी सुद्धा हरिभक्त पारायणाकडे जाणार असल्याचं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. बीड जिल्ह्यातील भायाळा गावात आयोजित नारळी सप्ताहात त्यांनी हभप होणार असल्याचे जाहीर केले.त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी त्यांनी जनतेच्या प्रेमाबद्दल आभार मानले. गोपीनाथ मुंडे यांचे नाव घेत त्यांनी मोठे भावनिक आवाहनही केले.

भायाळा गावात नारळी सप्ताह आयोजित करण्यात आला होता. विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर मंत्री पंकजा मुंडे या बीड दौऱ्यावर आहेत. त्यांनी श्रीराम नवमी उत्सवात सहभाग घेतला. त्यानंतर पाटोदा तालुक्यातील भायाळा गावात गणेशानंद गडाच्या नारळी सप्ताहाला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित भाविक भक्तांशी आणि नागरिकांशी संवाद साधला. लोकसभा पराभवानंतर काही लोकांनी आत्महत्या केल्या. इतकं प्रेम भावांनी आपल्यावर केल्याचे त्या म्हणाल्या. तर भगवान गडावर माऊली मंदिराची उभारणी सुरू आहे. या मंदिराला सढळ हाताने कोट्यवधींची मदत करणाऱ्या देणगीदारांची पंकजा मुंडे यांनी पदराने दृष्ट काढली.तर या कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे यांचे नाव जगाला विसरू देणार नाही, मी अशी शपथ चितेवर घेतली आहे. गोपीनाथ मुंडे या नावाच्या संस्कारावर किती विश्वास आहे. माझ्या कातड्याचे जोडे केले आणि तुमच्या पायात घातले तरी ही फेड होणार नाही अशी भावनिक साद पंकजा मुंडे यांनी भायाळा गावातील नारळी सप्ताहात घातली.











