पुण्यात टोळक्यांकडून नऊ वाहनांची तोडफोड ; कोयता उगारून केली दहशत, वानवडी परिसरातील घटना

गेल्या दीड महिन्यांपासून विधानसभा निवडणुकांचा माहोल असल्याने गुन्हेगारी कारवाया काही प्रमाणात कमी झाल्याचे जाणवले. परंतु, आता मतदान होऊन एक दिवस होताच पुन्हा शहरात गुन्हेगारांनी मुंडके वर काढले आहे. पुण्यातील वानवडी परिसरातील भैरोबानाला येथे कोयतेधारी टोळक्याने भरदुपारी दहशत माजवत वाहनांची तोडफोड करून धुडगूस घातला आहे. टोळक्याने कार, रिक्षा, टेम्पो, दुचाकी अशा नऊ वाहनांची तोडफोड केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मयुर उत्तम गायकवाड (वय ३२) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, भैरोबानाला परिसरातील सेंट पॅट्रीक चर्चजवळ चिमटा वस्ती आहे. गुरुवारी भरदुपारी टोळके वस्तीत आले. त्यांच्याकडे कोयते आणि दांडके होते. त्यांनी कोयते आणि दांडके उगारुन दहशत माजवण्यास सुरूवात केली. नंतर पार्क केलेल्या कार, रिक्षा, टेम्पो, दुचाकींची तोडफोड करुन टोळक्याने धुडगूस घातला. तसेच, रहिवाशांना शिवीगाळ देखील केली.

तेव्हा मयूर गायकवाड हे घरातून बाहेर आले असता त्यांनाही या टोळक्याने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. ‘आम्ही या भागातील भाई आहोत. कोणी मध्ये पडले तर त्याला जिवे मारु’, अशी धमकी दिली. त्यानंतर टोळके तेथून निघून गेले. त्यांनी जाताना कालव्याजवळ लावलेली दुचाकी व रिक्षाचीही तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या टोळक्याच्या पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. याबाबत सहायक फौजदार कुंभार तपास करत आहेत.