
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. सोमवारी १ जुलै रोजी त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मात्र, त्यानंतर राज्यसभेत उभं राहून मल्लिकार्जुन खर्गेंनी हात जोडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागितली.

मल्लिकार्जुन खर्गे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेल्या भाषणाचा संदर्भ देत होते. यावेळी त्यांनी अध्यक्ष जगदीप धनखड यांना काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा एका विशिष्ट धर्माशी कसा जोडला गेला हे सांगितलं. खर्गे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी निवडणुकीदरम्यान काँग्रेसवर हल्लाबोल करताना अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यावर पक्षानं निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती. मात्र, पंतप्रधानांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही.

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, जे खरं बोलतात ते फार कमी बोलतात, पण जे खोटे बोलतात ते सतत बोलतात. एक सत्य सांगितल्यानंतर आणखी एक सत्य सांगण्याची गरज नसते. एकामागून एक खोटं, सातत्यानं खोटं सवयीनं बोललं जातं. हे मोदी साहेबांचे शब्द आहेत. ते पुढे बोलताना म्हणाले की, हे ऐकून तुम्हाला किंवा कोणाला वाईट वाटलं असेल, तर मी हात जोडून माफी मागतो. यानंतर त्यांनी हात जोडून अध्यक्ष जगदीप धनखड यांच्याकडे बोट दाखवलं. यावेळी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनीही जोरदार गोंधळ घातला.
मी फक्त सत्य बोललो, असं विरोधी पक्षनेते म्हणाले. सत्य हे आहे की, कोणीही कोणाचा बचाव करायचा नाही. निवडणुकीदरम्यान अनेक वक्तव्य आली पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांनी त्यांच्या भाषणात संबोधित केलं नाही. निवडणूक आयोगानं निवडणूक जाहीर करताना जात, धर्म इत्यादींवर आधारित चर्चा होणार नसल्याचं सांगितलं होतं. ३०० पेक्षा जास्त वेळा पंतप्रधान मोदी मंदिर, मशिदी, मुस्लिम आणि इतर धर्मांबद्दल बोलले. मुस्लिम, पाकिस्तान, समाजाचं विभाजन याविषयी २२४ वेळा बोलले. आमचा जाहीरनामा एका विशिष्ट धर्माशी जोडलेला होता, असंही म्हटलं गेलं.त्यांनी सांगितलं की, काँग्रेसनं ११७ तक्रारी दिल्या होत्या, त्यापैकी १४ तक्रारी पंतप्रधानांविरोधात होत्या. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे, त्यावर जनतेचा विश्वास असायला हवा. आम्ही पंतप्रधानांविरोधात तक्रार केली, पण कोणतीही कारवाई झाली नाही.









