
एरंडवणे येथील गणेशनगरमध्ये सुपारी घेण्यास नकार दिल्यामुळे तीन आरोपींनी एका तरुणाचे अपहरण करून त्याच्यावर वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत मनोज दत्तात्रय येनपूरे (वय २४) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी निखिल अंकुश गिरी, विकास ज्ञानेश्वर नलावडे आणि सचिन पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रात्री हातगाडीवर कुल्फी खात थांबले असताना, त्यांना ओळखणारे तीन आरोपी तिथे आले आणि त्यांनी फिर्यादीला त्यांच्या सांगण्यानुसार कोणाला तरी जीवे मारण्यासाठी विचारले. फिर्यादीने नकार दिल्याने, आरोपींनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवून एका पडीक घरामध्ये नेले.

तिथे त्यांनी फिर्यादीवर लाथाबुक्क्यांनी, स्क्रु ड्रायव्हरने आणि विटेने हल्ला केला आणि गंभीर जखमी केले. त्याचप्रमाणे, बिअरची बाटली फोडून ती फिर्यादीच्या गळ्याला लावून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित अधिक तपास करत आहेत.









