दसरा मेळाव्यातून हिंदुत्वाऐवजी उद्धव ठाकरेंकडून खानाच्या पिलावळीचा उदोउदो

हिंदुत्वावर चिखलफेक हे उद्धव ठाकरे यांचे ऐतिहासिक पाप, पण मुंबईकर निवडणुकांमध्ये निश्चितपणे कमळ फुलवतील

मुंबई – उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून सतत हिंदुत्वावर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर, भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याखेरीज दुसरे काहीही केले नाही. केवळ सोनिया आणि राहुल गांधी यांची भाषा शिवतीर्थावरून दसरा मेळाव्यात ऐकायला मिळाली. बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा वैचारिक वारसा खुलेआम सोडून देत त्यांचेच पूत्र उद्धव ठाकरे यांनी खानाच्या पिल्लावळीचे विचार पेरण्याचे काम केले. शिवतीर्थावरच बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ आहे. कालचे त्यांचे विचार ऐकून बाळासाहेबांच्या आत्म्याला अतीव दु:ख झाले असणार, असा प्रहार भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला.भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दसरा मेळाव्यातून स्व.बाळासाहेब ठाकरे हे विचारांचे सोने लुटत असत, वैचारिक मेळावा असायचा मात्र कालचा मेळावा हा ज्यांची वैचारिक सुंता झालेली आहे अशा लोकांचा मेळावा होता असाही घणाघात त्यांनी केला. पगारी संपादक संजय राऊत यांनी चिखलफेकण्याची भाषा करत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना लक्ष्य केले होते. त्यांच्यावर पलटवार करत बन म्हणाले की चिखलाबद्दल राऊतांनी बोलूच नये. शिवतीर्थावरून तुम्ही वैचारिक चिखल पसरवण्याचे काम केले. हिंदुत्वावर ज्या पद्धतीने चिखलफेक करण्याचे काम केले ते उद्धव ठाकरे यांचे ऐतिहासिक पाप आहे अशी प्रखर टीका  बन यांनी केली. जनतेने बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देणा-या उद्धव ठाकरेंना नाकारल्याचे चित्र कालच्या मेळाव्यात दिसले. रिकाम्या खुर्च्या हा फ्लॉप शो चा पुरावा होता असेही ते म्हणाले. मात्र इतिहास सांगतो जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने वैचारिक चिखल पसरतो तेव्हा कमळाचा उदय होतो. हिंदुत्व सोडलेल्यांना जनता धडा शिकवत मुंबईकर आगामी निवडणुकांमध्ये निश्चितपणे कमळ फुलवतील, असा विश्वास बन यांनी व्यक्त केला. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा सोनिया गांधींवर टीका करताना “तुम्हाला रामराज्य हवे की रोम राज्य हवे ?”, असा सवाल मतदारांना केला होता. त्याचा संदर्भ देत श्री. बन म्हणाले की, “तुम्हाला खान हवाय का प्रभू रामचंद्रांचा बाण हवा”, असा प्रश्न विचारण्याची वेळ उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी आणली आहे .

पगारी संपादक संजय राऊत यांनी कुऱ्हाडीची भाषा करत केलेल्या टीकेचा समाचार घेत श्री. बन म्हणाले की, खानाचे खंजीर घेऊन ज्यांनी लोकांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला त्यांनी कुऱ्हाडी बद्दल बोलू नये. मुंबईतल्या मराठी माणसाला तोडण्याचे काम, मुंबईतल्या मराठी माणसाला मुंबई बाहेर हद्दपार करण्याचे काम संजय राऊत यांनी केले. भाजपा, अमित शाह हे मराठी माणसाला तोडत नाहीत तर मराठी माणसाला जोडण्याचे काम करतात. अटल सेतू ,कोस्टल रोड बांधून आम्ही लोकांना जोडण्याचे काम करतो. मुंबईतल्या माणसाला मुंबईमध्येच घर देऊन त्यांना विस्थापित न होता प्रस्थापित करण्याचे काम करतो.