मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन, जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीचा घेतला आढावा
गडचिरोली – “माझ्या विकासाच्या अजेंड्यावर गडचिरोली जिल्हा अग्रक्रमांकावर असल्याने शासनाच्या सर्व विभागांनी याची जाणीव ठेवावी आणि त्यांच्या अजेंड्यावर देखील हा जिल्हा अग्रक्रमावर ठेवून त्या पद्धतीने गडचिरोलीत विकासकामे करावी,” असे आवाहन मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्हा नियोजन भवन येथे घेतलेल्या मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी जिल्हा आणि राज्य पातळीवर समन्वय यंत्रणा कार्यरत आहे. ती सुरळीतपणे कार्यरत राहील याकडे लक्ष द्यावे. विशेषतः मध्यप्रदेशातून येणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांकडे दक्षतेने लक्ष देण्याचे निर्देश दिले. पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये पुरेसे अन्नधान्य, औषधांचा साठा आणि गर्भवती महिलांसाठी सुरक्षित ठिकाणी स्थलांतराच्या उपाययोजनांची तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी करावयाच्या कायमस्वरूपी उपयोजनाअंतर्गत मंजूर पाच टप्प्यांपैकी किमान दोन टप्पे यंदा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वनक्षेत्रातील रस्त्यांच्या बांधकामांबाबत वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग आणि संबंधित इतर विभागांनी समन्वय ठेवून काम करावे. टायगर कॉरिडॉर व्यतिरिक्त इतर मार्गांवर निर्बंध असू नये. वनविभागाने काम करताना लोकाभिमुखता ठेवावी, वन अधिकाऱ्यांकडून गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही, मनमानी केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यातील महत्त्वाचे रस्ते व पूल प्रकल्प जलद गतीने पूर्ण करावेत. वडसा ते गडचिरोली रेल्वे भूसंपादनाचा आढावा घेताना या कामात दिरंगाई होत असल्याचे सांगून ही भूसंपादन प्रक्रिया कालमर्यादेत निश्चित करून तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्याच्या एकूण प्रगती करिता ज्या काही तरतुदी करणे आवश्यक आहे व प्रस्तावित करण्यात आले आहे, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, या संदर्भात सहपालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करावा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
गडचिरोलीचे विषय थेट माझ्यापर्यंत आले पाहिजे यासाठी मी जाणीवपूर्वक येथील पालकमंत्री पद घेतले आहे. लोकप्रतिनिधी व इतरांनी मांडलेल्या सर्व विषयाची नोंद मी घेतली आहे व त्यानुसार जे धोरणात्मक निर्णय घ्यायचे आहेत ते निर्णय घेण्यात येतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.