
आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला आपल्या सुख-दुःखात साथ देणारा एक जोडीदार हवा असतो. वयाच्या एका टप्प्यावर पोहोचलो की, घरात लग्नाची बोलणी सुरू होतात. काही लोकांची लग्न अगदी सहज जुळतात. मात्र, काही लोकांना आपल्या मनासारखा जोडीदार मिळवण्यात अनेक अडचणी येतात आणि त्यात बराच वेळही निघून जातो. यानंतर व्यक्ती जोडीदाराच्या शोधात अगदी पारखून न घेता लग्नासाठी तयार होतो, ज्याचे वाईट परिणाम कधीकधी भविष्यात भोगायला लागतात. असंच काहीसं मध्य प्रदेशातील एका तरूणासोबत घडले आहे.

शुक्रू अहिरवार हे छतरपूरमधील एका गावात आपल्या कुटुंबासह राहतात. प्रत्येक आईवडिलांप्रमाणे त्यांनाही आपल्या मुलासाठी सुयोग्य वधू हवी होती. मात्र, अनेक प्रयत्नांनंतरही त्यांच्या मुलाचे लग्न जुळून येत नव्हते. याच दरम्यान त्यांच्या एका नातेवाईकाने त्यांना सांगितले की, ते छत्तीसगडमधून त्यांच्या मुलासाठी वधू शोधू शकतात, परंतु त्यासाठी ५०,००० रुपये द्यावे लागतील. मात्र, शुक्रू अहिरवार यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती.तरीही त्यांना मुलाचे लग्न तातडीने करायचे होते. म्हणून, त्यांनी ५०,००० रुपयांसाठी आपली जमीन गहाण ठेवली. इतकंच नाही तर, लग्नासाठी त्यांनी अतिरिक्त ८०,००० रुपये खर्च केले.

पण, लग्नाच्या रात्रीपासून मुलगी वरापासून दूर राहू लागली. चौकशीनंतर वराला कळले की, वधू एक किन्नर आहे, तेव्हा त्याला धक्का बसला. पण, बदनामीच्या भीतीने या कुटुंबाने गप्प राहायचे ठरवले. पण, दुसऱ्याच दिवशी वधू घरी जाण्याचा आग्रह करू लागली आणि कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. त्यानंतर ती संपूर्ण रात्र गावातील एका टेकडीच्या मागे लपून राहिली. शोध घेतल्यानंतर ती सापडली. पण, गावकऱ्यांना वेगळाच संशय आला. त्यांनी तिला ताबडतोब रुग्णालयात नेले. तिथे वधू एक तृतीयपंथी असल्याचे सिद्ध झाले. शिवाय, ती अल्पवयीन देखील होती. हे ऐकून सर्वांना धक्का बसला. यानंतर लगेच पोलिसांना बोलावण्यात आले.पोलीसांकडून आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, घडल्या प्रकारामुळे तरुणाच्या कुटुंबाला धक्का बसला असून, संपूर्ण गावात त्यांच्यावर टीका होत आहे.









