
राज्यातील वीजदर कमी होणार असून, महिना शंभर युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या वीज ग्राहकांसाठी प्रति युनिट एक रुपयांने वीज स्वस्त होणार आहे. महावितरणच्या वीजदर कपात याचिकेला वीज नियामक आयोगाने मंजुरी दिल्याने येत्या पाच वर्षात वीजदर टप्प्याटप्प्याने कमी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यात एक एप्रिलपासून नवे वीजदर लागू होणार असून, घरगुती ग्राहकांसाठी महिना शंभर युनिटपर्यंत सरासरी दर ८ रुपये १४ पैशांवरून कमी होऊन ७ रुपये १० पैसे होणार आहे. तर, शंभर ते तीनशे युनिटपर्यंतचा दर १३ रुपये २३ पैशांवरून १२ रुपये ९४ पैसे होणार आहे. तसेच औद्योगिक ग्राहकांसाठीचा दर १० रुपये ८८ पैशांवरून कमी होऊन १० रुपये ७१ पैसे होणार आहे. छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांच्या सवलती कायम राहणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.

महावितरणच्या २०२५ -२६ ते २०२९ -३० या पंचवार्षित वीजदर याचिकेवर आयोगाने गेल्या वर्षी मार्च अखेरीस एक आदेश दिला होता. त्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर बोट ठेऊन जूनचा आदेश रद्द करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयानेही नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचे पालन करून व तांत्रिक बाबी पूर्ण करून आदेश देण्याची सूचना नोव्हेंबरमध्ये केली होती. त्यानुसार नवा आदेश वीज नियामक आयोगाने प्रसिद्ध केला आहे.










