एकनाथ शिंदेनी भाजपची ऑफर नाकारली ; “श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद द्या” शिंदेच्या मागणीने भाजपसमोर नवा पेच

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. यानंतर आता महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे. एकनाथ शिंदे यांनी मलाच मुख्यमंत्री करा ही मागणी लावून धरली होती. मात्र, काही अपक्ष आणि अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना जाहीर पाठिंबा दिल्याने शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडवा लागला आहे. यामुळे नाराज असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आता दोन नव्या मागण्या केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या या नव्या मांगण्यामुळे भाजप आणि एकूणच महायुतीच्या नेते संकटात सापडले असल्याचे दिसत आहे

माहितीनुसार, भाजपकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या मोबदल्यात केंद्रात महत्त्वाच्या खात्याचे मंत्रीपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर दिली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही ऑफर्स फेटाळल्या आहेत. त्याऐवजी एकनाथ शिंदे यांनी एक नवा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला आहे. “मला राज्यात मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर मला गृहमंत्री करण्यात यावे. कारण राज्यातील विधानसभा निवडणूक ही माझ्या नेतृत्त्वाखाली लढवण्यात आली होती, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. तसेच आपला मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे,” अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या या मागणीने भाजप आणि महायुतीचे नेते गोंधळात पडले आहे. भाजपने अद्याप या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याबाबत भाजपच्या वर्तुळात अद्याप विचार सुरु असल्याने सरकारच्या शपथविधीला उशीर होत असल्याचे सांगण्यात येत आहे.एकनाथ शिंदे यांच्या ऑफरबाबत आता भाजपचे नेते काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपद सोडण्यास राजी असले तरी श्रीकांत शिंदे यांना थेट उपमुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांना कितपत रुचेल, हे बघावे लागेल. कारण कालपर्यंत दिल्लीतील राजकारणाशी संबंध असलेल्या श्रीकांत शिंदे यांना थेट अजित पवारांच्या पंक्तीला आणून बसवणे, कितपत योग्य ठरेल, हा प्रश्न आहे. भाजपच्या दबावामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीमधून माघार घेतली आहे.मात्र, शिंदे यांनी केलेल्या मागण्यांमुळे महायुतीसमोर नवा पेच निर्माण होणार आहे.