जेवणात मटण करी खाणे ४ जणांच्या जीवावर बेतले आहे, २ जणांची प्रकृती चिंताजनक

(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – कर्नाटक राज्यातील रायचूरमधील कल्लूर गावात रात्रीच्या जेवणात मटण करी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. इतर दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

६० वर्षीय भीमन यांच्या घरी रात्री जेवणात मटन करी केली होती. ती खाल्ल्यानंतर थोड्याच वेळात त्यांची तब्येत खालावली. त्या वेदनांनी ते ओरडून लागले. त्यांचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. तेव्हा शेजाऱ्यांना भीमान, त्याची पत्नी इरम्मा, मुलगा मल्लेश आणि मुलगी पार्वती यांच्या तोंडातून फेस येत अल्याचे आढळले. ज्यामुळे त्यांच्यासोबत काहीतरी वाईट झाल्याचा अंदाज त्यांना आला. उपचारासाठी दवाखान्यात नेण्याआधीच त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता.

त्याशिवाय, कुटुंबातील इतर दोन सदस्य, मल्लम्मा आणि आणखी एक व्यक्ती जीवंत असून त्यांच्यावर रायचूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटने मागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. जेवण बनवताना अन्नात काहितरी पडले असावेत, त्यामुळे जेवण विषारी बनले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याशिवाय, आर्थिक विवंचना आणि कर्जाच्या ओझ्याला कंटाळून सामूहिक आत्महत्या केल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतले आहेत. “मटण करी खाल्ल्यानंतर भीमन, इरम्मा, मल्लेश आणि पार्वती यांचा मृत्यू झाला, तर मल्लम्मा आणि आणखी एक व्यक्ती गंभीर आजारी आहेत,” असे पोलिस प्रवक्त्यांनी सांगितले. या हृदयद्रावक घटनेमागील सत्य उघड करण्यासाठी पोलिस अधिकारी सखोल तपास करत आहेत.