
प्रवासी व चालकांना केंद्रस्थानी ठेवून ॲप आधारित टॅक्सी संस्थांनी व्यवसाय करण्याचे शासनाचे आवाहन , नेमकी मागणी काय?

मुंबई – आपल्या विविध मागण्यांसाठी ॲप आधारित वाहन चालकांनी गुरुवारी बंदची हाक दिली असून मुंबई महानगरात सकाळपासून ९० टक्के ॲप आधारित वाहन सेवा बंद आहे. त्यामुळे ओला, उबर, रॅपिडोची सेवा विस्कळीत झाली आहे. तर दुसरीकडे सरकार बैठका घेत आहे.

ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक टॅक्सीसाठी समुच्चयक धोरण नियमावली येत्या दोन दिवसात जाहीर होत असून त्यामध्ये प्रवासी आणि चालकांच्या अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक सेवा पुरविणाऱ्या संस्थांनी व्यवसाय करताना प्रवासी व चालकांना केंद्रस्थानी ठेवावे. नफा कमविण्याच्या प्रयत्नात त्यांची आर्थिक लुबाडणूक करून व्यवसाय वृद्धी करु नये, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्या. मंत्रालयात इंडियन फेडरेशन ऑफ ॲप -बेस ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या संस्थांच्या संदर्भात अनेक तक्रारी प्रवासी व चालकांकडून प्राप्त झालेल्या आहेत. यापैकी काही संस्था नफेखोरीच्या नादात प्रवासी व चालकांची आर्थिक लुबाडणूक करत असल्याचे वेळोवेळी निष्पन्न झाले आहे. त्यासाठी निश्चित नियमावली तयार करून वाजवी भाडे आकारणे तसेच चालकांना उत्पन्नातील ८० टक्के परतावा देणे अशा महत्त्वाच्या सुधारणांचा समावेश असलेले समुच्चयक धोरण येत्या दोन दिवसात जाहीर केले जाणार आहे. या धोरणामुळे ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक टॅक्सी चालवणाऱ्या संस्थांवर शासनाचे नियंत्रण राहील. त्यामुळे प्रवाशांना आणि या संस्थेकडे काम करणाऱ्या चालकांना न्याय मिळेल. राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याच्या हेतूने या धोरणाच्या माध्यमातून ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक सेवा एकाच नियमावलीच्या छताखाली आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे या व्यवसायाला निश्चित अशी दिशा प्राप्त होईल. त्यातून प्रवाशांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याबरोबरच चालकांच्या हक्काचे व अधिकाराचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी ओला, उबर, रॅपिडो आणि अन्य ॲप आधारित रिक्षा, टॅक्सी, कॅबचे चालक विविध प्रकारे आंदोलन करीत होतेपरंतु, अद्याप या मागण्या पूर्ण होत नसल्याने, गुरुवारी ॲप आधारित रिक्षा, टॅक्सी कॅब चालकांनी बंदची हाक दिली होती. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.









