मनोज जरांगे पाटील यांची मुंबईकडे कूच, फडणवीस यांना इशारा, न्यायालयाचे ‘हे’ ४० नियम पाळावे लागणार
जालना- मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करणार आहेत. मुंबईतील आंदोलनासाठी निघालेल्या मनोज जरांगे यांना जालना पोलिसांनी ४० अटी-शर्तींसह परवानगी दिली आहे. त्यानंतर जरांगे यांनी मुंबईकडे कूच केली आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज लाखो आंदोलकांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबईकडे निघण्यापूर्वी त्यांनी आंतरवली सराटीतून आंदोलकांना संबोधित करताना त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत इशारा दिला. जरांगे म्हणाले, ‘काल लातूरमध्ये एका तरुणाने पुन्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण असे करू नका, तुम्ही मराठ्यांना अडवलं आहे. गॅझेट्स आहेत, मराठा आणि कुणबी एकच आहेत. मुख्यमंत्री साहेब मराठ्यांचा संयम ढासळून देऊ नका. असं जरांगेंनी म्हटलं आहे. मी मराठा आरक्षणासाठी बलिदान द्यायला तयार आहे. मुंबईत आल्यावर मला गोळ्या झाडा. आमच्या शेकडो आत्महत्या तुमच्यामुळेच झाल्या आहेत. याला तुम्हीच जबाबदार आहात. असा आरोपही जरांगेंनी यावेळी केला. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आंदोलनापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या मोर्चासाठी ४० अटी शर्तींसह परवानगी दिली आहे. प्रवासादरम्यान आक्षेपार्ह घोषणा, जातीय तेढ निर्माण करणारी विधाने होऊ नये. जाहीर केलेला मार्गच वापरावा; प्रवासादरम्यान मार्ग बदलू नये. रुग्णवाहिका, फायर ब्रिगेड आदी अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवासादरम्यान जर खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले, तर त्याची भरपाई आयोजक आणि आंदोलनकर्त्यांना करावी लागेल. नागरिकांनी हातात घातक शस्त्र, लाठी, तलवार, दगड, ज्वलनशील पदार्थ बाळगू नयेत. यासह आणखी ३५ अटीही न्यायालयाकडून घालण्यात आल्या आहेत.
सात – आठ टप्पे ठरले आहेत. एकानेही दगडफेक जाळपोळ करायची नाही. निर्णायक टप्प्यांवर आंदोलन होईल’, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. कृपया आत्महत्या करू नका. शांततेचे आंदोलन कुणीही रोखू शकत नाहीच. शातंता कुणीच सोडायची नाही’, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.