अजित पवार यांच्याकडून पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा

पाऊस कमी झाल्यावर तातडीने पंचनामे सुरू करण्याच्या सूचना, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

मुंबई – राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात राज्यातील मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीचा आढावा घेतला. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, घाबरून जाऊ नये.सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी,अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्या आहेत.

राज्यातील मुंबई, ठाणे ,रायगड रत्नागिरी ,पालघर या ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच घाटमाथ्यावरील भागावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दर तीन तासाला पावसाबाबत अहवाल सादर केला जात आहे. पावसामुळे जे बाधित लोक आहेत त्यांना सहकार्य करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. राज्यात पावसाची संततधार सुरू असून १० लाख एकर शेती पाण्याखाली गेली आहे. राज्यातील जी धरणे भरली आहेत त्या ठिकाणी जलसंपदा व शासकीय यंत्रणेमार्फत लक्ष ठेवण्यात येत आहे. नदीकाठच्या लोकांना ज्या ठिकाणी धोका पोहोचण्याची शक्यता आहे त्यांना सावध करण्यासाठी शासकीय यंत्रणेमार्फत संदेश पोहोचवण्याचे काम करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. सर्व नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्या ठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफ टीम पोहोचल्या असून मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जे नागरिक पाण्यात अडकले होते त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याचे काम सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर प्रशासन संपर्क साधून असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत दर तीन तासाला अपडेट दिले जात आहेत, अशी माहितीही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.

या सर्व परिस्थितीवर मुख्यमंत्री, कृषिमंत्री व सर्व पालकमंत्री लक्ष ठेवून आहेत. ज्या ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा ठिकाणी पाऊस कमी झाल्यावर तातडीने पंचनामे सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये, सर्व परिस्थितीवर यंत्रणा लक्ष ठेवून आहेत,अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.