मित्राला का मारता विचारल्याने दुकानदाराच्या पोटात कात्रीने वार करुन केले जखमी; ४ जणांना अटक

दुकानात गप्पा मारत असलेले असताना पाच जणांचे टोळके येऊन मित्राला मारु लागले. तेव्हा मित्राला का मारता असे विचारल्याने टोळक्याने दुकानदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन पोटात कात्रीने वार करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

सुशिल सुरेश शिंदे (वय ३८), सुमित सुरेश शिंदे (वय ३५), अजय दशरथ गाडे (वय ३८), विशाल शाम कांबळे (वय २९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.याबाबत जितेंद्र ओमप्रकाश गोयल (वय ४७, रा. नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना नाना पेठेतील अशोक चौकातील जय भवानी स्टोअर येथे १८ सप्टेबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे जय भवानी स्टोअर या नावाचे दुकान आहे. फिर्यादी व त्यांचा मित्र किर्ती विठ्ठलदास कणानी हे दुकानात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी ५ जण आले. त्यांनी काही कारण नसताना किर्ती कणानी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा फिर्यादी यांनी त्या मुलांना किर्तीला का मारहाण करता, असे विचारले. त्यांना त्याचा राग येऊन त्यांतील ३ जणांनी फिर्यादी यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्यातील एकाने दुकानाच्या काऊंटरवरील नेहमीच्या वापरातील कात्री हातात घेऊन फिर्यादी यांच्या पोटात दोन वेळा मारुन त्यांना गंभीर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक गोरड तपास करीत आहेत.