
जुन्या वादातून टोळक्याने पालघन उगारून वाहनांची तोडफोड करुन नुकसान केल्याची घटना लोणी काळभोर भागात घडली आहे. हा प्रकार रविवारी दि.२३ ला घडला असून पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.रवींद्र साहेबराव झेंडे यांनी याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. झेंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी अविनाश कामठे, प्रसाद दत्तात्रय जेटीथोर, अक्षय पवार, गणेश घोडसे यांच्यासह इतर तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

रविंद्र झेंडे आणि अविनाश कामठे यांच्यात किरकोळ वाद झाला होता. याचा राग मनात धरून आरोपी अविनाश आणि त्याचे साथीदार झेंडे यांच्या घरासमोर रविवारी दुपारी एकच्या सुमारास आले. त्यांनी पालघन उगारून परिसरात दहशत माजवली. झेंडे आणि त्यांच्या साडूच्या दुचाकीची तोडफोड करुन दहशत माजवली. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला जीवे मारून टाकतो, अशी धमकी आरोपींनी दिली, असे झेंडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.तर राणी महादेव कामठे यांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चंद्रशेखर उर्फ पिल्या चोरमले , किरण अण्णा चव्हाण , आशिष उर्फ सोन्या रविंद्र झेंडे, अतिष विनोद झेंडे, रोहित महादेव पाटील, यश जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राणी कामठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांच्या घरासमोर आले. कामठे यांचा मुलगा अविनाशचा मित्र प्रेम शेट्टी याच्या अॅक्टिव्हा व पार्किंगमधील दुचाकींची तोडफोड केली. कामठे यांच्या घराच्या दरवाज्यावर लाथा मारून व पालघन मारुन नुकसान केले. पालघन हवेत फिरवून शिवीगाळ करुन तुमच्या मुलाचा खून आम्ही करणार, अशी धमकी देऊन परिसरात दहशत माजवून आरोपी पसार झाले, असे राणी कामठे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.









