
(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – कर्ज थकल्याने गाडी जबरदस्तीने ओढून नेताना रिकव्हरी ऑफिसरांनी महिलेला धक्काबुक्की करुन तिचा टॉप फाडून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी एका ४० वर्षाच्या महिलेने बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पियुष शर्मा, साहिल शेख, आतिष खंडागळे या रिकव्हरी ऑफिसरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बिबवेवाडीतील रम्यनगरी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे शुक्रवारी सकाळी साउेअकरा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या दुचाकीवरुन घरी जात होत्या. त्यावेळी वाटेत तिघांनी त्यांना अडवले. आपण क्रेडिट वाईज कॅपिटल फायनान्स या कंपनीचे ऑफिसर असल्याचे सांगितले. त्यांनी या कंपनीकडून कर्ज घेऊन गाडी घेतली होती. कर्ज थकल्याने त्यांची गाडी जबरदस्तीने ओढून नेऊ लागले. तेव्हा त्यांनी विरोध केल्यावर तिघांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यांना धक्काबुक्की करुन त्यांचा टॉप खांद्यावर फाडून फिर्यादींचा विनयभंग करुन गाडी घेऊन गेले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक लोंढे तपास करीत आहेत.









