
मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची माहिती, दहशतवादी हल्ल्यात सहा नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सहा नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची आर्थिक मदत वितरित करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या राज्यातील नागरिकांच्या कुटुंबियांना सुरवातीस 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, नंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मदत रक्कम वाढवून प्रत्येकी ५० लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार मदत व पुनर्वसन विभागाने मृतांच्या कुटुंबियांना ही आर्थिक मदत वितरित केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात देशातील २६ जणांचा मृत्यू झाला होता. यात सहा महाराष्ट्रातील नागरिकांचा समावेश होता. सरकारकडून आता अतुल मोने – डोंबिवली, संजय लेले – डोंबिवली, हेमंत जोशी- डोंबिवली, संतोष जगदाळे- पुणे, कौस्तुभ गणबोटे- पुणे, दिलीप देसले- पनवेल यांच्या कुटुंबांना मदत देण्यात आली आहे. दरम्यान दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राबरोबरच तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, युएई, नेपाळ आणि उत्तर प्रदेश-हरियाणा येथील लोकही मारले गेले आहेत. मृतांमध्ये सर्व पुरूषांचा समावेश होता.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून मिळालेली ही मदत ही अशा कठीण काळात कुटुंबीयांना थोडा आधार देणारी आहे, अशी भावनाही मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केली.









