वाहनांची तोडफोड करणार्‍या ५ जणांना अटक ; आरोपींची त्याच भागात येरवडा पोलिसांनी काढली धिंड..

पुणे – भररस्त्याने जाणार्‍या गाड्या थांबवून त्यांच्या काचा फोडणार्‍या पाच जणांना येरवडा पोलिसांनी अटक केली. त्यांनी ज्या भागात दहशत माजविली होती. त्याच ठिकाणी येरवडा पोलिसांनी त्यांची धिंड काढून पोलीस गुन्हेगारांना सोडणान नाही, असा संदेश दिला आहे.

सचिन काकासाहेब कांबळे (वय २०), अहमद हनीफ शेख (वय २०), अमन मौला पिंजारी (वय १९), आझर अरिफ सय्यद (वय १९), इब्राहिम तैय्यब बाशोएब (वय २०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत रंजित अंगत पांडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते २० ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार वाजता आपल्या बहिणीला एअरपोर्टला सोडून घरी जात होते. आंबेडकर चौकत बर्‍याच गाड्या थांबल्या असल्याने त्यांनाही कार थांबवावी लागली. अचानक काही जण समोरुन आले व त्यांची फिर्यादी यांच्या गाडीसमोर येऊन आरडाओरडा करुन त्यांच्या कारच्या पुढील काचेवर मारल्याने काच फुटली. या प्रकाराने घाबरुन ते तशीच कार घेऊन पुढे गेले व त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन माहिती दिली. या टोळभैरवांनी संतोष भालचंद्र जाधव यांच्या कारचीही काच फोडली होती.

येरवडा पोलिसांनी तपास करुन पाच जणांना अटक केली. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी रात्री आंबेडकरनगर तसेच घटनास्थळी पोलीस या आरोपींना बंदोबस्तात घेऊन गेले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके व त्यांचे सहकारी यांनी दहशत माजविणार्‍या या गुन्हेगारांना हातात बेड्या घालून परिसरात नेले. गुन्हेगार मान खाली घालून पोलिसांच्या बरोबर जात होते. गुन्हेगार कितीही मोठा असला तरी पोलिसांपुढे त्याचे काही चालणार नाही, असा संदेश पोलिसांनी आंबेडकरनगर वासियांना दिला.

Dailyhunt